<p style="text-align: justify; ">योजनेची उद्दीष्टे :-</p> <p style="text-align: justify; ">नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.</p> <p style="text-align: justify; ">योजनेची वैशिष्ट्ये :- कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2 टक्के ठेवण्यात आला आहे.</p> <p style="text-align: justify; ">योजना कार्यान्वीत करणारी यंत्रणा - पंतप्रधान पीक विमा योजना रायगड जिल्ह्यात ओरिएंटल इन्शुरन्सविमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.</p> <p style="text-align: justify; ">योजनेत सहभागी शेतकरी :- सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी तसेच कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.</p> <p style="text-align: justify; ">अधिसुचित पिके - भात व नाचणी</p> <p style="text-align: justify; ">जोखमीच्या बाबी - या योजनेअंतर्गत पुढील कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाईल.</p> <p style="text-align: justify; ">1) पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात नैसर्गिक आपत्ती व कीड रोग यामुळे येणारी घट. पीक पेरणीपूर्व, लावणीपूर्व नुकसान भरपाई- अपूरा पाऊस,हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी (सदरची पेरणी, लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असावे.)</p> <p style="text-align: justify; ">हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई - हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत उदा. पूर,पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.</p> <p style="text-align: justify; ">काढणी पश्चात नुकसान - चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. सदरचे नुकसान काढणी, कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त 14 दिवस नुकसान भरपाईस पात्र राहील. योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतला आहे त्या संबंधित वित्तीय संस्थेस किंवा संबंधित विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून 48 तासांचे आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.</p> <p style="text-align: justify; ">स्थानिक नैसर्गिक आपत्ती- या योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीस नुकसान भरपाई वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार आहे.</p> <p style="text-align: justify; ">आवश्यक कागदपत्रे 1) पूर्ण माहिती भरलेले विमा घोषणा पत्र 2) जमिनीचा पुरावा म्हणून 7/12 उतारा 3) पीक पेरणी दाखला म्हणून शेतकऱ्यांनी शेतात पिकाची पेरणी, लागवड केल्याबाबत स्वयंघोषणापत्र</p> <p style="text-align: justify; ">विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर</p> <p style="text-align: justify; ">या योजनेत भात पिकांसाठी रु.42,100/- व नागरी पिकासाठी रु.20,000/-प्रति हेक्ट्र असून विमा हप्ता दर भात व नागरी पिकांसाठी अनुक्रमे रक्कम रुपये 210.50 व 100 आहे. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होणेसाठी दिनांक 31 जुलै 2018 अखेर विमा हप्ता व विमा अर्ज केवळ आपल्या नजिकच्या बँकेत किंवा राज्य सरकारने विमा हप्ता व विमा अर्ज स्वीकारण्यासाठी अधिमान्यता दिलेल्या आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत ऑनलाईन पद्धतीने संबंधित पिकाकरिता भरावा. सदर योजनेत सहभागी होण्याकरिता आवश्यक असणारे शेतकऱ्याने भरावयाचे विमा प्रस्ताव पत्र कृषि कार्यालयात, बँकेत उपलब्ध असून सर्व इच्छुक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या गावांत कार्यरत असलेले कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि कार्यालयात संपर्क साधावा.</p> <p style="text-align: justify; ">संकलनः जिमाका रायगड, अलिबाग</p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: <a class="ext-link-icon" href="https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=ZH6gVyv7Wz4=" target="_blank" title="नवीन विंडोमध्ये ओपन होणारी बाह्य साईट">महान्युज</a></p>