गहू उशिरा गव्हाची पेरणी केली असेल व गहू पीक शेतात सध्या उभे असेल तर कंबाईन हारवेस्टरच्या सहाय्याने काढणी करून घ्यावी. कंबाईन हारवेस्टरची उपलब्धता नसल्यास मंजुरांमध्ये योग्य ते अंतर ठेवून शक्य तितक्या कमी मजुरांच्या सहाय्याने गव्हाची कापणी व मळणी करून घ्यावी. कृषि उतपन्न बाजार समिति बंद असल्यास गव्हाची योग्य पद्धतीने वाळवणी करून सेल्फॉस वापरुन गोदामात साठवणूक करावी. काढणी पश्चात गव्हाचे काड न जाळता, जमिनीची नांगरणी करून शेत पुढील हंगामासाठी तयार ठेवावे. ऊस सुरु उसाची लागण झालेल्या क्षेत्रात पिक ४ महिन्याचे होईपर्यंत खुरपणी व कोळपणी करून तण विरहीत ठेवावे. उन्हाळा चालू झाल्याने उसाला योग्य वेळेच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.ऊस पिकास पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा . पाणी कमी असल्यास सरी वरंबा पद्धती मध्ये एक आड एक सरीस पाणी द्यावे. सुरु हंगामी लागवड केलेल्या उस पिकाच्या लागणीस ६ ते ८ आठवडे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता १०० किलो नत्र (किलो २१७ युरिया) प्रती हेक्टरी या प्रमाणात द्यावा. उन्हाळी भुईमूग उन्हाळी भुईमूगाच्या आ-या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करु नये. उन्हाळी भुईमूगाच्या आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी ते शेंगा पोसण्याच्या कालावधीत पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुगास शक्य असल्यास स्प्रिंकलर पद्धतीने पाणी द्यावे उशिरा भुईमूग पेरणी झाली असल्यास झाडांना माती लावावी भुईमूग पिकावर टिक्का रोग येऊ नये म्हणून कार्बेन्डाझिम 4 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.टिक्का रोग नियंत्रणासाठी मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारावे. शेंगा तयार होत असताना जास्तीत जास्त शेंगा तयार होण्यासाठी ७० ग्रॅम ००:५२:३४, ५० ग्रॅम मल्टीमायक्रोन्युट्रीएंट/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला सततच्या वाढत्या तापमानामुळे सर्व भाजीपाला पिकात पाण्याचे योग्य नियोजन करावे. कांदा काढणी साठी आला असल्यास काढणी करून शेतात 3 ते 4 दिवस सुकवावा नंतर पात कापून 3 आठवडे सावलीत सुकवावा तदनंतर प्रतवारी करून साठवणूक करावी. लसूण काढणी झाल्यानंतर पातीचा रंग परतल्यानंतर जुड्या बांधून हवेशीर ठेवावा. गवार पिकाची तोडणी वेळोवेळी करावी. भेंडी पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमिथोएट 30 ई.सी., 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील तण काढून घ्यावे त्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. वेल वर्गीय पिकामध्ये रस शोषून घेणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायमिथोइट 30 किंवा इमिड्क्लोप्रिड 17.8 % एस एल 5 मिली व डायथेन एम- 45 (25 ग्रॅम) ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यातून हातपंपाने करावी. भेंडी, वांगी, भोपळा इ. भाजीपाला पिकावरील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ % निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनिल २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकावरील कोळीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन ३०% ई.सी., ५ मिली किंवा डायकोफॉंल १८.५% ई.सी., २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे. डाळिंब डाळींबाचा आंबे बहार घेतला असल्यास ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन करावे खत व्यवस्थापनासाठी फेर्टीगेशन तंत्राचा वापर करावा. ब्लोअर च्या सहाय्याने कीटक / रोग नाशकाची फवारणी करावी बागेत दोन ओळीत गवत वाढले असल्यास ट्रॅक्टरच्या सहाय्याने फणनी किंवा रोटावेटरच्या तण काढावे. उन्हापासून फळाचे संरक्षण होण्यासाठी फळांना कागदी पिशव्या अथवा जुन्या कापडी पिशव्या चे फळांना आच्छादन करावे. तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी झाडांची नैसर्गिकरीत्या पानगळ होईपर्यंत ताण द्यावा. पानगळ झालेल्या काड्याच्या शेंड्याकडील भाग वाळून जाई पर्यंत ताण द्यावा त्यामुळे काड्यांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच उच्च तापमानामुळे डोळ्यांजवळ असणारे जीवाणू मरून जातील व पुढील बहारा मध्ये रोगाचे प्रमाण कमी होईल. बहार छाटणी करतेवेळी शेंड्याकडील १० ते १५ से.मी. लांबीचा भाग छाटून काढावा तसेच शिफारशीत खतांची मात्रा देवून नियमित पाणीपुरवठा करावा. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून असल्यास १३५ किलो कार्बोफ्युरॉन ३ जी प्रति हेक्टरी झाडांभोवती रिंग पद्धतीने पुरेसा ओलावा असताना टाकून झाकावे. द्राक्ष फळाच्या काढणीस अडथळा आल्या कारणाने शेतकरीबंधूनी आपले नुकसान टाळण्या करिता सध्याचा झाडावरील द्राक्षमाल बेदाण्या मध्ये परिवर्तित करण्यासाठी उपाय योजना करावी. पूर्ण काढणी झाली असल्यास व पुढील १०-१५ दिवसांनी खरड छाटणी करण्याचे नियोजन असेल तर तत्पुर्वी जमिनीचे व पाण्याची अन्नद्रव्य व खताच्या नियोजनासाठी तपासणी करून घ्यावी. केळी केळीच्या बुंदयाजवळ वाढणारी पिल्ले नियमीत कापावीत तसेच केळीवरील जुनी वाळलेली व रोगट पाने कापून बाग स्वच्छ ठेवावी. ठिबक सिंचन द्वारे पाणी व्यवस्थापन करून बाग वापस्यावर राहील याची काळजी घ्यावी केळीचा घड निसवल्यावर केळफूल कापावीत . केळीच्या घडाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केळीच्या वाळलेल्या पानांची पेंडी करुन केळीचा घड व घडाचा दांडा झाकावा. केळीचा घड पूर्ण निसवल्यावर त्यावर 0. 5 % पोटॅशियम डायहैड्रोजन फॉस्पेट + 1 % युरिया + स्टिकर अथवा 10 पीपीएम 2-4-डी द्रावणाची फवारणी केल्याने केळी घडाच्या आकारमानात व गुणवत्तेत वाढ होईल. वजनाने मोठया असलेल्या घडास बांबूच्या सहाय्याने टेकू द्यावा. खोडवा पीक घेण्यासाठी मुख्य बागेची 70 - 75 टक्के निसवन झाल्यावर खोडवा धरावा त्यासाठी केली घडाच्या विरुद्ध बाजूचे एकसारख्या उंचीचे तलवारीच्या पात्यासारखी पाने असणारे पिल्ले राखावीत. आंबा नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना वाऱ्यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा. मोठ्या झाडांना फळधारणेनंतर जमिचा प्रकार, झाडाचे वय, पाण्याची उपलब्धता ई. विचारात घेवून योग्य वेळेच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊ नये म्हणून फळझाडांच्या खाली वाळलेली पाने, तूर काड्या, उसाचे वाळलेले पाचट इ. चे आच्छादन करावे. लिंबु वर्गिय पिके काळी माशीच्या नियंत्रणासाठी १५ ग्रॅम अॅसिफेट ७५% पाण्यात मिसळणारी पावडर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाळीव जनावरे (गाई म्हशी शेळ्या मेंढ्या इत्यादी) जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता राखावी. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धूवूनच गोठ्यात जावे. गोठ्यात चूना भुरभुरावा. जनावरांना दिवसभर पिण्याचे पाणी हवे तेव्हा मिळेल याची सोय करावे. चा-याचा तुटवडा भासु नये यासाठी शेतातील दुय्यम पदार्थ जसे गव्हाचे काड, हरभरा , तुर, इ चा भुसा साठवून ठेवा दुपारच्या वेळी जनावरांना हिरवा मका, चवळी, कडवळ, लसूणघास यासारखे पोषण वैरण द्यावी. जंताच्या व विविध आजाराच्या नियंत्रणासाठीपशु वैद्यकाच्या सहाय्याने जंतनाशक व लसीजनावरांना पाजावे/ टोचून घ्यावे. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार शेळ्यांना स्ट्रॅँगाईल (गोलकृमी) या जंताच्या निर्मुलानाठी एप्रिल महिन्यामध्ये फेनबेन्डाझोल हे जंतनाशक द्यावे. उन्हाळ्याच्या सुरवातीस एप्रिल महिन्यामध्ये मेंढ्यांना देवी या रोगाची प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. स्त्रोत: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी