<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">ग्रामीण भागात पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी अनेक वेळा पिण्यासाठी वापरावे लागते. त्यातून अनेक पोटाच्या आजारांना आमंत्रण मिळते. हे टाळण्यासाठी मायकेल ली यांनी शेवग्याच्या बियापासून पाणी शुद्धीकरणाची सोपी प्रक्रिया तयार केली आहे. त्यामुळे पाण्यातील ९० ते ९९ टक्के हानीकारक जिवाणू कमी करणे शक्य होते. या प्रक्रियेविषयी अधिक माहिती ‘करंट प्रोटोकोल्स इन मायक्रोबायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित केली आहे.</p> <p style="text-align: justify; ">आफ्रिका, आशिया आणि लॅटीन अमेरिकेतील अनेक देशांमध्ये शेवग्याची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. यांपैकी अनेक देशांमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवणे ही एक मोठी समस्या आहे. अशुद्ध पाण्यामुळे दर वर्षी सुमारे २ दशलक्ष लोकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यातच या भागामध्ये आरोग्यसुविधाही नसल्याने, हालअपेष्टांमध्ये भर पडते. लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होते. मात्र, आता हे टाळणे शक्य होणार आहे. कॅलिफोर्निया येथील सेफ वॉटर इंटरनॅशनल येथील मायकेल ली यांनी शेवग्याच्या बिया वापरून पाणी शुद्धीकरणाची सोपी पद्धती तयार केली आहे. या प्रक्रियेमुळे पाण्यातील हानीकारक जिवाणूंच्या संख्येमध्ये ९० ते ९९ टक्के घट होत असल्याचे दिसून आले आहे.</p> <h3 style="text-align: justify; ">विविध प्रयोगाचे निष्कर्ष</h3> <ul style="text-align: justify; "> <li> पाण्याच्या शुद्धीकरणासाठी शेवग्याचा तीन प्रकारे उपयोग केला जातो. शेवग्याची बियांची भुकटी, तेल आणि तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेली पेंड यांचा वापर केला जातो. </li> <li>शेवग्याच्या बियांमध्ये साधारणपणे ३५ ते ४० टक्के तेल असते. सामान्यतः या तेलामध्ये ओलेईक आम्लाचे प्रमाण अधिक असते. मात्र अधिक गढूळ पाणी शुद्धीकरणासाठी हे तेल फारसे कार्यक्षम ठरत नसल्याचे विविध प्रयोगांतून दिसून आले आहे. </li> <li> एका बीपासूनची भुकटी एक लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी पुरेशी असते. </li> <li> शेवग्याच्या दोन प्रजाती आहेत. त्यातील M. oleifera ही जगभर आढळणारी प्रजाती आहे. त्यातुलनेत आफ्रिकन प्रजाती M. stenopetala ही कमी प्रमाणात असली तरी पाणी शुद्धीकरणाच्या बाबतीत अधिक कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. (जॉन, १९८८) </li> </ul> <h3 style="text-align: justify; ">अशी आहे शुद्धीकरणाची प्रक्रिया <strong><br /></strong></h3> <ul style="text-align: justify; "> <li> चांगल्या वाळलेल्या शेंगा झाडावरून काढाव्यात. त्यातील बिया काढून सरळ उन्हामध्ये २ ते ३ दिवस कडक वाळवून घ्याव्यात. </li> <li> त्यानंतर बियांवरील आवरण काढून घ्यावे. घरातील मिक्सर किंवा दगडी पाटा-वरंवटा यांच्या साह्याने बारीक कराव्यात. </li> <li> 0.8 मि.मी. आकाराच्या चाळणीने (चहाची चाळणीही चालू शकेल.) चाळून घ्यावे. थंड, कोरड्या आणि हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ही भुकटी १ ते २ महिन्यांपर्यंत चांगली राहते. </li> <li> अंदाजे२ ग्रॅम भुकटी साधारणपणे ३५० मि.लि. आकाराच्या बाटलीत घ्यावी. त्यात १०० मिली स्वच्छ पाणी मिसळून घट्ट झाकण लावून पाच मिनिटे जोरात हलवावे. त्यानंतर १० मिनिटे शांत होऊ द्यावे. हे द्रावण २४ तास वापरता येते. मात्र शक्यतो दर वेळी ताजे द्रावण करून वापरणे चांगले. </li> <li> गढूळ पाणी भांड्यात घेऊन ते चांगले ढवळावे. १० लिटर पाण्यामध्ये वरील शेवग्याचे द्रावण सुती कपडा व गाळणीच्या साह्याने गाळून ओतावे. ३० ते ६० सेकंदांपर्यंत पाणी जोरात ढवळावे. त्यानंतर पुढील पाच मिनिटे प्रति मिनिट १५ ते २० वेळा याप्रमाणे सावकाश ढवळावे. </li> <li> झाकण ठेवून पाणी सुमारे एक तासापर्यंत शांत राहू द्यावे. त्यानंतर स्वच्छ सुती कापडाने पाणी गाळून घ्यावे. आता पाणी ढवळले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. </li> <li> हे पाणी साधारणपणे आठ तासांपर्यंत रोगकारक जिवाणूमुक्त राहते. त्यानंतर त्यात हवेतून जिवाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून पिण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी शुद्ध करावे. </li> </ul> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">स्त्रोत:<a class="external-link ext-link-icon" href="http://www.agrowon.com/Agrowon/20140728/5059722782685769072.htm" target="_blank" title="नवीन विंडो मध्ये ओपन होणारी बाह्य साईट "> अग्रोवन</a></p> <p style="text-align: justify; "><img src="https://static.vikaspedia.in/media/images_mr/agriculture/SakalAgrowonLogo.jpg" class="image-inline" title="" alt="" /></p> </div>