<div id="MiddleColumn_internal"><ol> <li style="text-align: justify; ">रताळी लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येईल. लागवडीकरिता जमिनीची चांगली मशागत करावी. साधारणपणे 60 सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. </li> <li style="text-align: justify; ">लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करावी. लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील व मधल्या भागातील बेणे निवडावे. बेण्याची लांबी 20 ते 30 सें.मी. असावी व त्यावर तीन ते चार डोळे असावेत. एका गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे 800 तुकडे लागतात. लागवड करताना बेणे वरंब्यावर 25 सें.मी. अंतरावर लावावे. प्रत्येक ठिकाणी एक फाटा (बेणे) लावावा. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा व दोन्ही टोके उघडी ठेवावीत. बेण्याच्या मधल्या भागावरील दोन डोळे मातीत पुरले जातील, अशी काळजी घ्यावी. 3) सऱ्या करण्यापूर्वी पुरेसे शेणखत मिसळावे, तसेच लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी 40 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे. </li> <li style="text-align: justify; ">लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून 30 दिवसांनी करावी. त्याच वेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यांतून मुळे फुटतात. अशा वेळी लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत. </li> <li style="text-align: justify; ">लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी.</li> </ol> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">स्त्रोत :<a class="external-link ext-link-icon" href="http://www.agrowon.com/Agrowon/20141120/5622951642055776864.htm" target="_blank" title="नवीन विंडो मध्ये ओपन होणारी बाह्य साईट "> अग्रोवन</a></p> <p style="text-align: justify; "><img alt="" title="" class="image-inline" src="https://static.vikaspedia.in/media/images_mr/agriculture/SakalAgrowonLogo.jpg" /></p> </div>